ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
भीमा कोरेगावच्या शौर्यातून पेटले रण: वॉर्ड १७५ मध्ये ‘हक्काची ताई’ रेणुका साठेंच्या विजयाचा एल्गार!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : भीमा कोरेगाव शौर्य दिन हा केवळ स्मरणाचा नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे ठाकण्याचा आणि सत्तेला जाब विचारण्याचा दिवस आहे. १ जानेवारी रोजी या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या कार्यक्रमात वॉर्ड क्रमांक १७५ मधील राजकीय लढतीला स्पष्ट दिशा मिळाली.
रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) यांच्या अधिकृत उमेदवार रेणुका गणेश साठे यांनी भीमा कोरेगाव शौर्यस्तंभास मानवंदना अर्पण करत “समता, स्वाभिमान आणि न्याय” ही केवळ घोषणा नसून कृतीत उतरवण्याची वेळ आल्याचा ठाम संदेश दिला.

भीमा कोरेगावचा विजय हा इतिहासातील पानांपुरता मर्यादित नसून आजच्या राजकारणालाही दिशा देणारा आहे. सत्ताकेंद्रांकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात, वंचित-बहुजनांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची प्रेरणा भीमा कोरेगाव देतो. याच प्रेरणेतून रेणुका साठे यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालत समाजहित, समान संधी आणि सर्वांगीण विकासासाठी अखंड लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
वॉर्ड क्रमांक १७५ मध्ये आजही मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना केवळ आश्वासनांची राजकारणे पुरेशी नाहीत, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. “हा वॉर्ड आता फसव्या राजकारणाला कंटाळला आहे. जनतेला हक्काच, लढणार आणि रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणार नेतृत्व पाहिजे आहे,” असा ठाम सूर उपस्थितांमध्ये दिसून आला. त्यामुळेच रेणुका साठे आपली हक्काची ताई असा नारा कार्यक्रमस्थळी घुमला.
घराघरात पोहोचून जनतेचा विश्वास जिंकण्याची, संघटित ताकदीने निवडणूक लढवण्याची आणि प्रचंड बहुमताने विजय मिळवण्याची हाक देण्यात आली. भीमा कोरेगावच्या रणधुमाळीप्रमाणेच ही लढाईही निर्णायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.




