ताज्या बातम्या
संपाचा इशारा; महावितरणकडून राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची युद्धपातळीवर तयारी

मुंबई, ८ जुलै २०२५ : राज्यभरातील सहा वीज कर्मचारी संघटनांनी ९ जुलै रोजी २४ तासांचा संप पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी आपत्कालीन नियोजन पूर्ण केलं आहे. संपूर्ण राज्यात यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र आणि संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी संप पुकारणाऱ्या संघटनांच्या प्रमुखांसोबत दोन वेळा चर्चा करून प्रमुख मागण्यांवर सकारात्मक संवाद साधला. तरीही संप न टाळता आल्यामुळे, वीज ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि पर्यायी मनुष्यबळ सज्ज
संपाच्या दिवशी राज्यातील सर्व मुख्यालये व परिमंडळ कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून दर तासाला वीजपुरवठ्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचविण्यात येणार आहे. बाह्य स्त्रोत कर्मचारी, कंत्राटदार, व निवडसूचीतील कर्मचारी यांना स्थानिक कार्यालये व उपकेंद्रांमध्ये नियुक्त केले आहे. तसेच, वाहन व सुविधा पुरवण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना दिले गेले आहेत.
साधनसामुग्रीचा मुबलक साठा
संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर, केबल्स, वीजतारा, खांब, फिडर पिलर्स, वाहने आदी आवश्यक सामग्री सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे. गंभीर कारणाव्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवांची विशेष खबरदारी
पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, सरकारी कार्यालये आणि घरगुती ग्राहकांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. कुठेही वीजपुरवठा खंडित झाल्यास बॅकफिडिंगच्या माध्यमातून त्वरित सेवा पुनः सुरु करण्याचे नियोजन आहे.
२४x७ ग्राहक सेवा उपलब्ध
वीजपुरवठ्याबाबत तक्रारी, सूचना किंवा शंका असल्यास, टोल फ्री क्रमांक १९१२, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ वर २४ तास संपर्क साधता येणार आहे. ग्राहकांनी अफवांपासून सावध राहून संपकाळात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.