ऊर्जा क्षेत्राचा सखोल अभ्यास; अतुल खराटे यांना एनर्जी मॅनेजमेंटमध्ये पीएचडी
ऑइल-गॅस, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन आणि हरित ऊर्जेच्या भविष्यासंदर्भातील संशोधनाला मान्यता

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
ऊर्जा व्यवस्थापन, ऑइल-गॅस क्षेत्र आणि हरित ऊर्जेच्या भविष्यासंदर्भातील सखोल संशोधनासाठी मुंबईतील उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अतुल खराटे यांना डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, नवी मुंबई यांच्या वतीने एनर्जी मॅनेजमेंट विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील ऑइल आणि गॅस क्षेत्राची सध्यस्थिती, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन व्यवस्था, तसेच भविष्यातील ऊर्जा धोरणे आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व धोरणे या विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या धोरणांचा आणि भविष्यातील संधींचा अभ्यास त्यांच्या संशोधनात मांडण्यात आला आहे.
सध्या इंडियन ऑइल अदाणी वेंचर्स लिमिटेड येथे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले अतुल खराटे हे मूळचे विदर्भातील खामगाव येथील आहेत. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते मुंबई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.

याशिवाय विविध राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान, सामाजिक आणि मॅनेजमेंट शिक्षण संस्था, बीजेपी उद्योग आघाडी, तसेच सीआयआय, एफआयसीसीआय, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी आणि कार्बन कॅप्चर यांसारख्या संस्थांमध्ये ते राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून कार्य करत आहेत.
डॉ. अतुल खराटे यांच्या या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सीएमओ महाराष्ट्र, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार श्रीकांत भारतीय, उद्योजक अरुण लखानी, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगील, नागपूरमधील श्रीराम अर्बनचे अध्यक्ष पराग सराफ, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, आयआयएम मुंबईचे संचालक मनोज कुमार तिवारी, आयआयएम नागपूरचे संचालक भीमराव मैत्री, आयआयएम शिलाँगचे अतुल कुलकर्णी, बिल्ड इंडिया संस्थेचे अध्यक्ष वैभव डांगे, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे संजय गंजो, तसेच पद्मश्री डॉ. गणपती यादव आणि पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी अभिनंदन करून कौतुक व्यक्त केले आहे.
ऊर्जा क्षेत्रातील अभ्यास, उद्योग अनुभव आणि धोरणात्मक दृष्टिकोन यांचा संगम साधत डॉ. अतुल खराटे यांनी मिळवलेले हे यश महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.




