ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66 वा वर्धापनदिन

जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न


सत्यमेव जयते न्यूज कॉम

मुंबई : विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने आपला 66 वा वर्धापनदिन उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेत साजरा केला. या अवसरावर महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या वीर सैनिकावर आधारित एकपात्री लघुनाटिकेचा 5 हजारावा प्रयोग सादर करून उपस्थितांचे मन भारावून टाकले.

या छोट्या पण प्रभावशाली नाट्यप्रयोगात प्रत्येक संवादात शौर्य आणि प्रत्येक दृश्यात देशभक्तीची गंध होती. वर्धापनदिनाच्या आनंदात विद्यार्थ्यांना देशभक्तीची अमुल्य शिकवण मिळाली, ज्यामुळे शौर्य आणि त्याग यांचा संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी प्राचार्य डॉ. किशन पवार यांच्या हस्ते डॉ. पवन अग्रवाल, माजी विद्यार्थी संघटनेच्या संचालिका, वीरमाता अनुराधा गोरे, माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आतिश तौकरी, उपप्राचार्य डॉ. सत्यवान हणेगावे, प्राध्यापक डॉ. हेमाली संघवी, डॉ. संगिता भट, डॉ. महेंद्र मिश्रा, एनएसएस समिती सदस्य डॉ. अनंत द्विवेदी, माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक व मुख्य समन्वयक, तसेच एनसीसी, एनएसएस, मराठी प्रबोधन, कल्चरल फोरमचे विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती-

5000 व्या प्रयोगात इतिहास उजळला

 

26 सप्टेंबर 1995 रोजी जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर फक्त 27 वर्षांच्या कॅप्टन विनायक गोरे यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. दुसऱ्या दिवशी, 27 सप्टेंबर 1995 रोजी एनसीसी कॅडेट मनोज सानप यांनी के.जे. सोमय्या महाविद्यालयात ही एकपात्री लघुनाटिका प्रथम सादर केली. 5000 व्या प्रयोगादरम्यानही ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

मनोज सानप यांनी कधीही वैयक्तिक लाभ न घेता फक्त देशभक्तीची मशाल जिवंत ठेवली. या फाउंडेशन डेच्या विशेष सोहळ्यात हा 5000 वा प्रयोग सादर होणे महाविद्यालयाच्या संस्कारांना जिवंत ठेवण्याचे अद्वितीय उदाहरण ठरले.

वीरमाता अनुराधा गोरे यांनी या प्रसंगी सांगितले की, “एक कर्तृत्ववान शासकीय अधिकारी असलेल्या मनोज सानप यांचे कौतुक करणे कमी आहे. मागील तीस वर्षांपासून त्यांनी महाविद्यालयात ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ नाट्यप्रयोग सादर करून अनेकांना प्रेरणा दिली आहे. यामुळे अनेक युवक सैन्यात दाखल झाले, तर काहींनी रक्तदान, अवयवदान, सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान आणि समाजोपयोगी कार्यात सहभाग घेतला.”

माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप यांनी मनोज सानप यांच्या बालपणापासूनच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल अनुभवकथन केले. प्राचार्य डॉ. किशन पवार यांनी माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या जडणघडणीत योगदान देण्याचे आवाहन केले आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन दिले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यवान हणेगावे यांनी प्रगती अहवाल सादर केला, तर माजी विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस शिजो पॉल यांनी वार्षिक अहवाल वाचला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सिमरन महतानी यांनी केले, तर डॉ. मीरा वेंकटेश यांनी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीताच्या गायनाने सोहळा समारोप केला.

के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा वर्धापनदिन आणि मनोज सानप यांच्या देशभक्तीपर नाट्यप्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, त्याग आणि देशभक्तीची ज्वाला तेजस्वी झाली.


Related Articles

Back to top button