क्रौर्याचा शेवट फाशीवर; नसरापूरच्या चिमुकलीला अखेर न्याय! सीसीटीव्ही, कबुलीजबाब आणि सबळ पुराव्यांच्या आधारे भीमराव कांबळेला मृत्यूदंड; राज्य हादरवणाऱ्या प्रकरणाचा निकाल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पुणे |
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने अखेर फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर संतापाची लाट उसळलेल्या या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचा कबुलीजबाब आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे निर्णायक ठरले.
१ मे २०२६ रोजी घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आरोपीने खाऊ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीला सोबत नेले, तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावे लपविण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. या घटनेनंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला.
तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी भीमराव कांबळे चिमुकलीचा हात धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. या महत्त्वपूर्ण पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली होती.
मागील सुनावणीत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षेबाबतचा निर्णय २९ जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा सखोल विचार करून न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि समाजमन हादरवणारा असल्याचे नमूद करत आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशा स्वरूपातील अनेक प्रकरणांचा संदर्भ देत गुन्ह्याचे स्वरूप, पीडितेचे अल्पवय आणि आरोपीविरोधातील भक्कम पुरावे यांचा विचार करण्यात आल्याचे स्पष्ट केले. न्यायाधीशांनी हा गुन्हा अत्यंत क्रौर्यपूर्ण असल्याचे निरीक्षण नोंदवत कठोर शिक्षेची गरज अधोरेखित केली.
या निकालावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पीडित चिमुकलीचे आई-वडील न्यायालयात उपस्थित होते. आरोपीला मृत्यूदंडच व्हावा, अशी त्यांची सातत्याने मागणी होती. राज्यभर विविध संघटना, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलने आणि मोर्चे काढले होते.
अखेर विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य हादरवणाऱ्या या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजात अशा गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश देणारा हा निकाल मानला जात आहे.



