₹४५७.५० हेक्टरी विमा हप्ता; रायगडमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू

रायगड : राज्य शासनाने खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ या कालावधीत उत्पादनाधारित सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना एक वर्षासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यासाठी ‘भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई’ यांची निवड करण्यात आली असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपात राहणार आहे.
कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये अधिसूचित पिके पेरणारे, तसेच कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
यंदा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ई-पिक पाहणी (Digital Crop Survey App) द्वारे पिकांची नोंदणी व शेतकरी ओळख क्रमांक (AgriStack Farmer ID) अनिवार्य करण्यात आले आहेत. जर ई-पिक पाहणीतील माहिती व विमा अर्जातील माहितीमध्ये तफावत आढळली, तर विमा अर्ज रद्द करण्यात येणार असून, भरलेली हप्त्याची रक्कमही जप्त केली जाणार आहे.
विमा हप्ता दर (प्रती हेक्टर):
भात: ₹४५७.५०
नाचणी: ₹१००
(टीप: यंदा एक रुपयात विमा हप्ता योजना लागू नाही.)
आवश्यक कागदपत्रे:
विहित नमुन्यातील अर्ज
आधार कार्ड
स्वयंघोषणापत्र (पेरणी केलेल्या पिकाचे)
भाडेपट्टा करारनामा (लागल्यास)
संमतीपत्र
बँक पासबुकची प्रत
ई-पिक पाहणी पुरावा
शेतकरी ओळख क्रमांक
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. संभाव्य नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी मुदतीत विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.