ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडमध्ये नवीन आधार केंद्रांची घोषणा; मंजूर केंद्रे दुसऱ्याच ठिकाणी कार्यरत असल्याने पारदर्शकतेवर प्रश्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधार सेवा उपलब्ध व्हावी म्हणून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल ९९ नवीन आधार केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे. मात्र, या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आक्षेप घेतला आहे. संस्थेचे राष्ट्रीय मुख्य सचिव धनंजय म्हात्रे यांनी नमूद केले आहे की – “ज्या गावांसाठी आधार केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत ती केंद्रे प्रत्यक्षात त्या गावात सुरूच नाहीत. उलट ती केंद्रे दुसऱ्या गावात कार्यरत आहेत. अशा प्रकारे मंजुरी आणि प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असून, यामुळे प्रशासनाच्या कामकाजाविषयी शंका निर्माण होत आहे.”

संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन मागणी केली आहे की, सर्वप्रथम मंजूर झालेल्या पण दुसरीकडे सुरू असलेल्या केंद्रांची चौकशी करावी आणि त्यानंतरच नवीन केंद्रे मंजूर करावीत. अन्यथा नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या ७४ आधार केंद्रे सुरू असून वाढत्या लोकसंख्या व मागणी पाहता १५ तालुक्यांमध्ये नव्याने ९९ केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ सप्टेंबर २०२५ अशी आहे.

👉 आता आक्षेप नेमका असा मांडला आहे की “मंजूर केंद्रे त्यांच्या जागी सुरूच नाहीत, ती दुसऱ्या ठिकाणी चालवली जात आहेत.”


Related Articles

Back to top button