रेल्वेमार्गासाठी ‘तटकरे’ गतीशील! – केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीमध्ये भेट

नवी दिल्ली : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. या सदिच्छा भेटीत रायगड जिल्ह्यातील रेल्वे सेवा आणि पायाभूत सुविधा यांचे व्यापक उन्नतीकरण हवे, यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्थानिक रेल्वे स्थानकांचा विकास, प्रवाशांसाठी सुविधा सुधारणा, नवीन रेल्वे थांब्यांची मागणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात मुद्देसूद चर्चा झाली. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि जलद रेल्वे सेवा मिळावी, यासाठी केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी खासदार तटकरे यांनी केली.
रेल्वे मंत्री वैष्णव यांनीही या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले. आगामी काळात रायगडमधील रेल्वे नेटवर्क अधिक गतिमान आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.