रिलायन्स नागोठणे सज्ज! कूच बिहार ट्रॉफीत महाराष्ट्र-ओडिशाचा तरुणांचा रोमांचक संग्राम

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : रायगडमधील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! देशातील अव्वल तरुण क्रिकेटपटूंना घडवणारी प्रतिष्ठेची कूच बिहार ट्रॉफी आता थेट नागोठणेच्या मैदानावर रंगणार आहे. १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा हा चार दिवसीय सामना रंगणार असून, रिलायन्स प्रशासनाने या लढतीसाठी संपूर्ण मैदान झळाळून तयार केलं आहे.
रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष शशांक गोयल, कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रमुख पुनीत मिश्रा, हॉर्टिकल्चर प्रमुख शरद पवार यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी काल मैदानाची पाहणी करताना उपस्थित होते. खेळपट्टीपासून पॅव्हेलियनपर्यंत, आणि सुरक्षा व्यवस्थेपासून मैदानाच्या सौंदर्यपर्यंत, सर्वकाही बीसीसीआयच्या निकषांनुसार सज्ज केलं गेलं आहे.
या स्पर्धेतून अनेक तरुण खेळाडू भारतीय संघापर्यंत पोहोचतात, त्यामुळे नागोठणेतील हा सामना केवळ एक क्रिकेट इव्हेंट नसून रायगडच्या तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा देणारा क्षण ठरणार आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी सर्व क्रिकेटप्रेमींना विनामूल्य सामना पाहण्याचं आवाहन केलं आहे.
स्थानिक अकॅडमीतील खेळाडूंसाठी हे सामने म्हणजे ‘प्रत्यक्ष मैदानावर शिकण्याचं वर्गखोलं’च ठरणार आहे.




