ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

खड्ड्यांच्या विरोधात महास्फोट: रायगडकरांच्या जीवाशी खेळ! प्रशासन झोपेत की टक्केवारीच्या नशेत?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्ह्यातील रस्ते म्हणजे रस्ते नाहीत तर मृत्यूचे सापळे झाले आहेत! खड्डे की कबर हे ओळखणंही कठीण झालं आहे. खड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे गेल्या दोन महिन्यांत तब्बल तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक कायमच्या अपंगत्वासह जगत आहेत. तरीसुद्धा प्रशासन आणि सत्ताधारी आमदार मात्र टक्केवारीच्या व्यवहारात अडकलेले आहेत, असा घणाघाती आरोप शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेवर केला.
“खड्ड्यांविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणारच,” असा इशाराही त्यांनी दिला. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पेझारी चेक पोस्ट येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. अलिबागमधील शेतकरी भवन येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला तब्बल ४० कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता, त्यापैकी ३८ कोटी २१ लाख रुपये वितरितही झाले. पण काम झाले किती? केवळ १६ कोटी रुपयांचे काम! बाकीचे पैसे कुठे गेले? कोणाच्या खिशात गेले? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही.
गेल्या वर्षीही कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते दुरुस्ती झाली होती, पण आजही रस्त्यांची अवस्था दयनीयच आहे. म्हणजेच, कागदावर विकास, प्रत्यक्षात खड्ड्यांचा संसार!
अलिबाग-रेवस, अलिबाग-मुरुड, अलिबाग-वडखळ या महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था तर अगदी कफल्लक आहे. काही ठिकाणी विकासाच्या नावाखाली रस्ते उखडले आणि गायब झाले! गणेशोत्सव, नवरात्र, दैनंदिन प्रवास आता जीवावर उदार होऊन करावा लागत आहे.
या निष्क्रियतेविरुद्ध शेकाप आता थेट रणभूमीवर उतरणार आहे. पेझारी चेक पोस्टवर ७ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला जाग आणली जाणार आहे. “रस्त्यांच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार थांबवला नाही, तर आम्ही संपूर्ण जिल्हा ठप्प करू!”, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Back to top button