ताज्या बातम्यारायगड
शेकापचा मेळावा नव्हे, राजकीय रणभूमी! शिंदे गटावर आक्रमणाची सुरुवात
राज ठाकरे प्रमुख आकर्षण; कार्यकर्त्यांचा उत्साह उसळणार, आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!

रायगड : पनवेलमध्ये होणाऱ्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शेकापने शक्तिप्रदर्शनाची तयारी पूर्ण केली आहे. खास म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती या मेळाव्याला वेगळा राजकीय रंग देणार आहे. रायगडमध्ये शिंदे गट थेट शत्रू ठरेल, असा दावा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केला असून, आगामी निवडणुकीच्या रणनीतीसाठी हा मेळावा ‘गेम चेंजर’ ठरण्याची चिन्हं आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असून, प्रचंड उत्साहात मेळाव्याच्या तयारीला जोर आला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन यंदा पनवेलमध्ये दणक्यात साजरा होणार आहे. शनिवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता नवीन पनवेल येथे होणाऱ्या भव्य मेळाव्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून, राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या शक्तिप्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती. त्यांच्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर थेट घणाघात होण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस अॅड. गौतम पाटील यांच्यासह अनेक दिग्गज या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.
शिंदे गटावर थेट हल्लाबोल!
रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेकापचा हा मेळावा निर्णायक ठरणार आहे. शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा आमचा थेट आणि प्रमुख शत्रू असणार आहे.” त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वातावरण तापले आहे.
उत्साहाच्या लाटेत कार्यकर्ते; शक्तिप्रदर्शन निश्चित!
गावोगावी, शहरांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महिला, युवक, ज्येष्ठ कार्यकर्ते एकवटले असून, हा मेळावा त्यांच्या मनोबलात नवा जोश निर्माण करणारा ठरणार आहे.
इतिहास घडणार!’ – चित्रलेखा पाटील यांचा विश्वास
“या मेळाव्यातून मिळणारी विचारांची शिदोरी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्ये नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देईल. हा मेळावा ऐतिहासिक ठरणार, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे,” असे मत चित्रलेखा पाटील यांनी ठामपणे मांडले.
……..