रायगडचा झेंडा देशात फडकला; खालापूरच्या खरीवली-चांभार्ली ग्रामपंचायतींनी विकासाला दिला नवा आयाम
विश्वसनीय आणि परिणामकारक कामगिरीच्या बळावर दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कारावर कोरले नाव

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगडच्या कर्तृत्वाचा झेंडा आता थेट देशपातळीवर दिमाखात फडकला आहे! खालापूर तालुक्यातील खरीवली आणि चांभार्ली या ग्रामपंचायतींनी आपल्या सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कामगिरीच्या बळावर दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कारावर नाव कोरत देशपातळीवर मानाचे स्थान पटकावले आहे. या यशातून ग्रामीण विकासाचा नवा आयाम उभा राहत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयामार्फत दिला जाणारा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार हा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान केला जातो. ग्रामीण भागात सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकास साध्य व्हावा, हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.

या पुरस्कारांतर्गत आरोग्यसंपन्न, दारिद्र्यमुक्त, बालस्नेही, जलसमृद्ध, पर्यावरण स्नेही, पायाभूत सुविधांनी युक्त, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित व न्याय्य, सुशासनयुक्त आणि महिलास्नेही अशा नऊ विविध थीममध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड केली जाते. विजेत्या ग्रामपंचायतींना ५० लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतचा निधी पुरस्कार स्वरूपात दिला जातो, जो पुढील ग्रामीण विकासासाठी वापरला जातो.
यंदा खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध गाव’ या थीममध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावत मोठा मान मिळवला आहे. तर चांभार्ली ग्रामपंचायतीने ‘सामाजिकदृष्ट्या सुरक्षित व सामाजिक न्याय्य गाव’ या थीममध्ये देशात संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे तसेच खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे अभिनंदन केले आहे.
……




