राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटलमागे आता १७० रुपये मिळणार

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य व साखर वाटप करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, दुकानदारांना क्विंटलमागे मिळणारे मार्जिन १५० रुपयांवरून १७० रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली.
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत, राज्यातील ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून अन्नधान्य, साखर आणि इतर वस्तूंचे वितरण करतात. आतापर्यंत या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे एकूण १५० रुपये प्रति क्विंटल मार्जिन मिळत होते.
दुकानदारांच्या संघटनांनी मार्जिन वाढीची मागणी केल्याने, सरकारने क्विंटलमागे २० रुपयांची वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे आता रास्तभाव दुकानदारांना प्रति क्विंटल १७० रुपये, म्हणजेच प्रति मेट्रीक टन १७०० रुपये मिळतील. या निर्णयामुळे दरवर्षी अंदाजे ९२ कोटी ७१ लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार राज्य सरकारवर येणार आहे.