“बातमीचा ‘इम्पॅक्ट’! पुलांच्या धोका-दाखवणाऱ्या रिपोर्टची आयुक्तांकडून दखल”
"जनतेचा आवाज पोहोचला वरपर्यंत – आता पुलांच्या प्रश्नावर बैठक!"

रायगड : सत्यमेव जयते न्यूजने बुधवारी 30 जुलै रोजी प्रसिद्ध केलेली बातमी — “पुल लटकले आणि प्रशासन सटकले” — या माध्यमातून धोकादायक अवस्थेतील पुलांचा मुद्दा ठळकपणे समोर मांडण्यात आला होता. वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या बातमीची आता कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी स्वतः दखल घेतली आहे. त्यांनी हा विषय रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजित बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला असून, योग्य उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे विजय सूर्यवंशी हे पूर्वी रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकरी, गरीब, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्यशैलीला लोकांचा भरभरून पाठिंबा लाभला होता. अलिबाग तालुक्यातील एका दुर्गम आदिवासी वाडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतः दुचाकीवरून तिथे पोहोचले होते, ही घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
त्यांच्या बदलीची बातमी समजताच “सूर्यवंशी साहेबांची बदली करू नका” अशी मागणी जनतेने केली होती. आज, ते कोकण आयुक्त या जबाबदारीच्या भूमिकेत असताना रायगडच्या जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
त्यामुळे धोकादायक पुलांच्या प्रश्नावर केवळ चर्चा न राहता प्रत्यक्ष उपाययोजना आणि अंमलबजावणी होईल, अशी ठाम आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सत्यमेव जयते न्यूजच्या पत्रकारितेचा हा परिणाम जनतेच्या आवाजाला खऱ्या अर्थाने प्रशासकीय व्यासपीठ मिळवून देणारा ठरत आहे.
————
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमने आवाज उठवल्यानंतर हा विषय आता थेट कोकण आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे, आणि प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. ही घटना केवळ पत्रकारितेचा परिणाम दाखवणारी नसून, सत्यमेव जयते न्यूज जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत असल्याचा ठोस पुरावा आहे.
—
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
जनतेच्या प्रश्नांना वाचा – परिणामकारक, प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारिता!