ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“ईडीवर न्यायसंस्थेचा रोष; राऊतांची ‘नरकातली’ गोष्ट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली!”


मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालय (ED) करत असलेल्या कारवाया सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. विरोधकांचा आरोप आहे की, ईडीचा वापर केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी होतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतेच केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळजनक ठरले आहे.

गवई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ईडीचा राजकीय हेतूने वापर होतो हे महाराष्ट्रातील घटनांवरून स्पष्ट होते. राजकीय लढाया निवडणुकांमध्ये लढल्या पाहिजेत, न्यायालयाच्या माध्यमातून नाही.” सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाविरुद्ध ईडीने केलेली अपील फेटाळली आणि यावेळी न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्यासह सरन्यायाधीश गवई यांनी या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक थेट सरन्यायाधीशांना पाठवले आहे.

राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट करत म्हटलं,
“भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाची प्रत पाठवली. त्यांनी ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या संस्थेचे अघोरी उद्योग नेमके काय असतात, हेच मी या पुस्तकात मांडले आहे.”

राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी सुमारे १०० दिवस तुरुंगात घालवले असून, त्याच अनुभवांना शब्दबद्ध करून हे पुस्तक लिहिले आहे. यापूर्वीही त्यांनी हे पुस्तक राज्यातील अनेक भाजप नेत्यांना भेट म्हणून दिले आहे.

सरन्यायाधीशांचा स्पष्ट संदेश आणि संजय राऊत यांची थेट प्रतिक्रिया यामुळे ईडीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button