“नराधमांना समाजात जगण्याचा अधिकार नाही”; आरोपीला कठोर शिक्षा होणारच – आदिती तटकरे
जनता वसाहतीतील (पर्वती) चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात शासन आक्रमक; पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार ठाम उभे

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
“चिमुकलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. जनता वसाहतीतील (पर्वती) या संतापजनक प्रकरणातील आरोपीला कायद्यातील सर्वात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन पूर्ण ताकदीने उभे आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरातील जनता वसाहत (पर्वती) येथे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे. या अमानुष घटनेची माहिती मिळताच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस प्रशासन तसेच महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधत पीडित कुटुंबाला आवश्यक ते सर्व सहाय्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सदर प्रकरणात भारतीय न्यायसंहिता (BNS) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे घृणास्पद दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
“चिमुकलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. जनता वसाहतीतील या संतापजनक प्रकरणातील आरोपीला कायद्यातील सर्वात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन पूर्ण ताकदीने उभे आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असा कडक इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या आणि चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “नेमकं प्रशासन जागं होणार कधी?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना मानसिक धीर देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने समुपदेशन प्रक्रिया सुरू केली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना कायदेशीर तसेच मानसिक आधार देण्याचे काम हाती घेतले आहे. “मनोधैर्य” योजनेच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला तातडीची मदत देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
मात्र, अशा विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ आश्वासने पुरेशी नसून कठोर कायदे, जलद तपास आणि तातडीचा न्याय आवश्यक असल्याची भावना आता अधिक तीव्र होत आहे. पुण्यासारख्या शहरात चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडत असतील, तर ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची नव्हे तर समाजाच्या संवेदनशीलतेचीही गंभीर शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी आणि पीडित चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.




