“गणेशोत्सवाला वेगळा रंग देणारी आद्य नाईक स्मृती सजावट स्पर्धा”
“अनिल पाटील व जयेश ठाकूर ठरले सजावटीतील सरताज”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : गणेशोत्सवाची धूम, गावागावात सजावट आणि देखाव्यांची रेलचेल. पण या सगळ्यात उठून दिसली श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड आयोजित आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धा. अलिबाग तालुक्यातील विविध गावांमधून तब्बल १२३ स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि अनोख्या कल्पनांनी सजावट रंगवली.

मोठे शहापूरचे अनिल पाटील यांनी “माणसाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या शिक्षा” हा विचार करायला लावणारा देखावा साकारून सर्वांना थक्क केले. तर हाशिवरेचे जयेश ठाकूर यांनी “स्वामी समर्थ” या आध्यात्मिक स्पर्श असलेल्या सजावटीतून टाकाऊ वस्तूंनाही नवसंजीवनी दिली. या दोघांनी मिळवलेले प्रथम क्रमांक संपूर्ण स्पर्धेचे आकर्षण ठरले.

मुख्य विजेते व देखावे
अनिल पाटील, मोठे शहापूर – मृत्यूनंतर मिळणाऱ्या शिक्षा (प्रथम क्रमांक, ५५५५ रुपये)
हेमंत पाटील, चरी – खेड्याकडे चला (द्वितीय, ३३३३ रुपये)
वर्षा पाटील, खिडकी – बदलेले गोविंदा (तृतीय, २२२२ रुपये)
विष्णू मोकल, हाशिवरे – सिंदूर-पहलगाम हल्ला (चतुर्थ, ११११ रुपये)
रवीकांत म्हात्रे, कावाडे – छावा (पंचम, ११११ रुपये)

टाकाऊपासून टिकाऊ गटातील विजेते
जयेश ठाकूर, हाशिवरे – स्वामी समर्थ (प्रथम, ३००१ रुपये)
अर्जुन गावंड, फोफेरी – निसर्गातील गणेश (द्वितीय, २००१ रुपये)
दिशांत ठाकूर, मानकुळे – ऑपरेशन सिंदूर (तृतीय, १००१ रुपये)
याशिवाय अनेकांनी उत्तेजनार्थ देखावे सादर केले. जीर्ण मंदिर, विठ्ठल वारी, अश्मयुगीन गणेश, शिवाजी महाराज व किल्ला असे देखावे पाहून प्रेक्षक भारावून गेले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे सुरेश पाटील सर, ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, छायाचित्रकार समीर मालोदे, लहू पाटील व रत्नाकर पाटील यांनी संयमाने आणि कौशल्याने काम पाहिले.
बक्षिसांचे वितरण अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख), प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी, माजी सरपंच वैशाली पाटील, प्रवीण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. रत्नाकर पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. कांचन म्हात्रे यांनी रंगतदार शैलीत पार पाडले. यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.




