“न्यायासाठी प्रतीक्षा संपली पाहिजे; भारतीय न्यायव्यवस्थेत तातडीने सुधारणा हवी – सरन्यायाधीश भूषण गवई”

हैदराबाद : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील दीर्घकालीन समस्या आणि आव्हानांवर चिंता व्यक्त करत न्यायप्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. शनिवारी हैदराबाद येथील नालसर लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
“आपली न्यायव्यवस्था मोठ्या आव्हानांना सामोरी जाते आहे. अनेक खटले दशकानुदशके सुरू राहतात, आणि काही प्रकरणांमध्ये व्यक्तींनी वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर निर्दोष ठरण्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करताना मला असं वाटतं की आता सुधारणा अत्यावश्यक झाल्या आहेत,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
तथापि, भविष्यासंदर्भात आशावाद व्यक्त करत सरन्यायाधीश गवई म्हणाले की, “माझे सहकारी नागरिक आणि पुढील पिढी ही आव्हानांना समर्थपणे तोंड देतील आणि आवश्यक सुधारणा घडवून आणतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. “आईवडिलांवर आर्थिक बोजा न टाकता शिष्यवृत्तीच्या आधारे उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, कायद्यातील मार्गदर्शन केवळ प्रभावाच्या आधारावर न घेता प्रामाणिकपणावर आधारित मार्गदर्शक निवडण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
या समारंभाला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पीएस नरसिंहा आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुजॉय पॉल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.